Friday, September 3, 2021

नाभिक समाजाच्या प्रगतीला हवीय संघटनात्मक कृतीची जोड

  नाभिक समाजातील एक ज्वलंत दीप तेवत ठेवणारे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत श्री सेना महाराज यांनी उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांनी अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली. तत्कालीन वर्णभेद, बालविवाह, सतीप्रथा आदी वाईट चालीरीतीच्या कुप्रथेतून मानवी जीवनाला भयमुक्त करून मानवी जीवनाला स्वतंत्र जीवन जगण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. संत सेना महाराजांनी अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाला प्रयत्नवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आलाय. हे करत असतानाच आता विचारांची देवाणघेवाण, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल चर्चा, व्यवसायातील पुढील आव्हाने आदी बाबींवरही विचारमंथन होण्याची गरज निर्माण झाली आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून समाजाला वरदान लाभलेल्या कलेवर परप्रांतिय, धनधांडग्यांनी अतिक्रमणे करण्यास सुरूवात केली. कार्पोरेट कंपन्या सलून व्यवसायात उतरल्या. केश कापण्याबरोबरच दाढी करणे म्हणजे केशकर्तन नव्हे याही पलिकडे जाऊन या व्यवसायाला अधिक व्यापक कसे करता येते, हे कार्पोरेट कंपन्यांनी दाखवून दिले. मुलांमुलींतील वाढत्या सौंदर्याच्या कल्पनांमुळे हा व्यवसाय अधिकच व्यापक झाला. केशकर्तनाचा ‘व्यवसाय’ करून सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांनी आणि केशकर्तनाच्या कार्पोरेट कंपन्यांनी फ्रेंचाइजी देण्यास सुरूवात केली. केशकर्तनाचेच काम अत्यंत सुबक आणि व्यावसायिक पध्दतीने कसे करावे याचे तंत्र त्यांनी अंमलात आणले. नाभिक समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला ग्लोबल टच आणि कार्पोरेट लूक देऊन शिवाय देणाऱ्या सेवांचे ‘मोल’ कसे घेता येऊ शकते, याची समाज बांधवाला शिकवण दिली. हेअर कट, फेशियल, मसाज, हेड मसाज, हेअर डाय, ब्लिचिंग इतकेच नव्हे तर नखेदेखील वेगळ्या पध्दतीने कापून त्याचेदेखील सौंदर्य वाढविता येते. चेहऱ्यावरील व्रण घालविण्यासाठीच्या थेरपीची कामे हायटेक सलुनच्या माध्यमातून करण्यात येते हे दाखवून दिले. आधुनिकतेची कास धरत समाजाच्या व्यवसायावर नाभिक समाजेत्तर लोकांनी कब्जा मिळविण्याने हाताच्या कारागिरांवर उपाशी मरण्याची नामुष्की ओढवली. शहरी भागात समाजबांधव पारंपारिक दुकानांना ‘सलुन्स’चे लूक देत आहेत. रंगसंगती, आरामदायी खुर्च्या, अत्याधुनिक साधन-सामुग्रीचा वापर करून इतरांप्रमाणे ‘हायटेक’ होत आहेत. परंतु, ग्रामीण भागातील कारागिर हा अत्याधुनिक ज्ञानापासून अजूनही कोसोदूर आहे. कार्पोरेट कंपन्यांनी शहरी भागात जसा शिरकाव केला तसाच ग्रामीण भागात शिरकाव केल्यास ग्रामीण भागातील कारागिरांना भविष्यात उपासमारीचाच सामना करावा लागणार आहे. कारण ग्रामीण भागात सुमारे ६० ते ७० टक्के समाज आपल्या पारंपारिक सलून व्यवसायात कार्यरत आहे. आधुनिकतेची कास धरूनच त्यांना भविष्यात पारंपारिक व्यवसाय टिकविणे शक्य होणार आहे. शहरी भागातील तज्ज्ञ बांधवांनी ग्रामीण भागातील कारागिरांना अत्याधुनिकतेचे प्रशिक्षण देऊन ‘तज्ज्ञ’ करणे काळाची गरज बनली आहे. सामुहिक चिंतनाची गरज कोरोना विषाणुने संपूर्ण जगामध्ये अक्षरश: धुमाकुळ घातला. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आपले राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य समजून सलून व्यावसायिकांनी आपला नियमित खर्च, दुकान भाडे, वीजबिल, कर्ज देणी याची पर्वा न करता आपापली दुकाने बंद ठेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. सलून व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असलेल्यांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली. उत्पन्न घटल्याने समाज बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तरीही वैयक्तिक संकटांपेक्षा राष्ट्रीय संकटाशी झुंज देणे समाजबांधवांनी आपले आद्य कर्तव्य मानले. तरीसुध्दा समाज माध्यमावरून टिका आणि टिंगल टवाळकी नाभिकांचीच झाली. कोरोना विषाणूच्या संसर्गाकरिता सलून व्यावसायिक जवाबदार असल्याचा जावईशोध अनेकांनी लावला. असे असले तरीही लॉकडाऊनच्या काळात सलून दुकाने बंद असल्याने केस-दाढी वाढल्यानंतर समाजाची अनेकांना आठवण नक्कीच झाली. डोक्यावरील वाढलेले केस, दाढी या समस्येवर पर्याय शोधत अनेकांनी घरच्या घरी कटींग, दाढी करण्याची मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून ‘टक्कल’ केले. बायका, पोरांची ‘कलाकारी’चर्चेत येण्यासाठी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. टिंगल-टवाळकीच्या भावनेतून तयार झालेल्या अशा पोस्टला समाजबांधवांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण, लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बलुतेदारी पध्दतीत बदल करून उन्नतीसाठी ‘दुकानदारी’ करायला हवी. कोरोनानंतर सलून व्यवसायामध्ये सकारात्मक बदल झाले आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आरोग्याविषयी जागृत होऊन पैशांपेक्षा आपला जीव, आरोग्य महत्वाचे समजू लागला आहे. हीच बाब हेरून ग्राहकांच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनातूनही समाज बांधवाला बदल करणे आवश्यक आहे. हे कार्य कोणा एकाचे नसून याकरीता सामूहिक समन्वय आणि कृतीची गरज आहे. आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या साधनांचा संघटनांमध्ये सुरू असलेले वाद उफाळून काढणे, एकमेकांवर टिका टिपण्णी करण्यापेक्षा व्यावसाय वृध्दीच्या अनुषंगाने एकमेकांशी संवाद स्थापित करून व्यवसायाची दिशा निश्चित करण्याची गरज आहे. समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका बजावून आपल्या भागाची गरज, जीवन शैली आदींचा अभ्यास करून व्यावसायिक पध्दती, प्रक्रियेचा आराखडा तयार करायला हवा. श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सकारात्मकतेची कास धरण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केल्यास नक्कीच वैक्तिगत अन् समाजाची प्रगती साधली जाऊ शकते. तुषार विष्णू वखरे (औरंगाबाद) मो-९८८११७७९३३

Friday, March 19, 2021

प्रणाली तू असं करायला नको होतंस....

बहिणीची मैत्रीण प्रणाली हिने आत्महत्या केल्याचे कळताच घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला. प्रणालीचे लग्न बँकेतील अधिकाऱ्यांसोबत ठरले हे सांगताना काही वर्षांपूर्वी ती स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेली होती. वराकडील मंडळींनी हुंडा मागितला हे सांगताना मात्र तिचा चेहरा पडलेला होता. मुलीचे कल्याण होईल, ती सुखी राहील या आशेने तिच्या आई- वडिलांनी वराकडील मंडळींच्या प्रत्येक मागणी, गोष्टींची पूर्तता करून थाटात लग्न लावले. लग्नात अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही सासरच्या मंडळींची 'डिमांड' काही कमी झाली नाही. संसाराचा गाडा थोडा पुढे पुढे सरकायला लागला की सासरची मंडळी माहेरहून हे आण, ते आण म्हणून तिच्याकडे 'डिमांड' करायचे. आई-वडिलांनी ह्यांना कितीही दिले तरी कमीच असतं हे प्रणालीला कळून चुकलं होत. अनेकदा 'ती' गप्प बसुन सासरच्या मंडळींचा छळ सहन करत गेली. यातच 'गोड' बातमी कळल्यानंतर ती होणाऱ्या छळाकडे दुर्लक्ष करत गेली. काही महिन्यांपूर्वी तिने एक गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्याच्या आनंदात ती न्हाहून निघाली. पण तो क्षणही तिच्यासाठी क्षणिकच होता. मुलगी झाली म्हणून सासरची मंडळी नाराज होती. तिला बघायलाही कोणी आले नाही. आनंदाच्या क्षणी सासरच्या मंडळींचे असे वर्तन बघून तिला मानसिक धक्काच बसला. महिना, दोन महिने, तीन महिने उलटूनही सासरच्या मंडळींच्या अशा वर्तनामुळे ती मानसिक तणावात होती. माहेरी असताना नवरा-बायको यांच्यात फोनवर वाद झाला अन प्रणालीने मागचा-पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलून गळफास घेतला. तिच्या या निर्णयामुळे जसा आम्हाला धक्का बसला त्याही पेक्षा जास्तच तिच्या आई- वडिलांना बसलेला असेल. कोणाचं मन न दुखवणारी, हसऱ्या स्वभावाची मुलगी तिच्या एका निर्णयामुळे सर्वांना रडवत आहे. नराधम पती, हावरट स्वभावाची सासरची मंडळी यांना तू धडा शिकवायला हवा होता. परंतु, प्रणाली तुझी काहीही चूक नसताना तू स्वतःला शिक्षा करून घेतलीय. असं तू खरंच करायला नको होतंस. तुझा छळ करणाऱ्या प्रत्येकाला न्याय व्यवस्था शिक्षा देईल, पण तुझ्या त्या गोंडस मुलीच्या भविष्याचा तू विचार करायला हवा होतास. असतात गं सासरच्याकडील मंडळी हावरट. त्यांना कितीही केलं आणि कितीही दिलं तरी कमीच असते. मुलीसाठी आई-वडील काय काय सहन करतात हे कदाचित अनेकांना कळत नाही, कारण त्यांना मुलगी नसते ना. मुलगा म्हणजेच त्यांच्यासाठी सर्वकाही असतो. 'पती' म्हणजे हक्क गाजवणारा असतो. तो म्हणेल, सासरची मंडळी म्हणेल तीच दिशा त्यांच्यासाठी योग्य असते. हे तुला कळून चुकलं असेलच म्हणूनच रोजच्या छळाला कंटाळून तू मुक्ती मिळवून घेतलीय गं. पण या जगात असा त्रास सहन करणारी तू एकटी नव्हतीस हे कदाचित तू विसरली असावी. तुझ्यासारखे दुःख सहन करणाऱ्या अनेक 'प्रणाली' आजच्या घडीला सासरची मंडळी, पतींचा त्रास सहन करताय. त्यांच्याप्रमाणे तुही मनाने सक्षम राहून त्यांना धडा शिकविण्यासाठी दोन हात करायला हवे होतेस. होऊन होऊन काय झालं असत, तुला लोकांनी नाव ठेवलं असत. लोकांचे कामच असतं गं नाव ठेवणं. त्याकडे दुर्लक्ष करून तू त्या नराधमांना न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून धडा शिकवायचा होतास. प्रणाली, तू संयम बाळगायला हवा होतास. पण असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतंस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवा, भावपूर्ण श्रद्धांजली.