Friday, September 3, 2021

नाभिक समाजाच्या प्रगतीला हवीय संघटनात्मक कृतीची जोड

  नाभिक समाजातील एक ज्वलंत दीप तेवत ठेवणारे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत श्री सेना महाराज यांनी उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांनी अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली. तत्कालीन वर्णभेद, बालविवाह, सतीप्रथा आदी वाईट चालीरीतीच्या कुप्रथेतून मानवी जीवनाला भयमुक्त करून मानवी जीवनाला स्वतंत्र जीवन जगण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. संत सेना महाराजांनी अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाला प्रयत्नवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आलाय. हे करत असतानाच आता विचारांची देवाणघेवाण, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल चर्चा, व्यवसायातील पुढील आव्हाने आदी बाबींवरही विचारमंथन होण्याची गरज निर्माण झाली आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून समाजाला वरदान लाभलेल्या कलेवर परप्रांतिय, धनधांडग्यांनी अतिक्रमणे करण्यास सुरूवात केली. कार्पोरेट कंपन्या सलून व्यवसायात उतरल्या. केश कापण्याबरोबरच दाढी करणे म्हणजे केशकर्तन नव्हे याही पलिकडे जाऊन या व्यवसायाला अधिक व्यापक कसे करता येते, हे कार्पोरेट कंपन्यांनी दाखवून दिले. मुलांमुलींतील वाढत्या सौंदर्याच्या कल्पनांमुळे हा व्यवसाय अधिकच व्यापक झाला. केशकर्तनाचा ‘व्यवसाय’ करून सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांनी आणि केशकर्तनाच्या कार्पोरेट कंपन्यांनी फ्रेंचाइजी देण्यास सुरूवात केली. केशकर्तनाचेच काम अत्यंत सुबक आणि व्यावसायिक पध्दतीने कसे करावे याचे तंत्र त्यांनी अंमलात आणले. नाभिक समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला ग्लोबल टच आणि कार्पोरेट लूक देऊन शिवाय देणाऱ्या सेवांचे ‘मोल’ कसे घेता येऊ शकते, याची समाज बांधवाला शिकवण दिली. हेअर कट, फेशियल, मसाज, हेड मसाज, हेअर डाय, ब्लिचिंग इतकेच नव्हे तर नखेदेखील वेगळ्या पध्दतीने कापून त्याचेदेखील सौंदर्य वाढविता येते. चेहऱ्यावरील व्रण घालविण्यासाठीच्या थेरपीची कामे हायटेक सलुनच्या माध्यमातून करण्यात येते हे दाखवून दिले. आधुनिकतेची कास धरत समाजाच्या व्यवसायावर नाभिक समाजेत्तर लोकांनी कब्जा मिळविण्याने हाताच्या कारागिरांवर उपाशी मरण्याची नामुष्की ओढवली. शहरी भागात समाजबांधव पारंपारिक दुकानांना ‘सलुन्स’चे लूक देत आहेत. रंगसंगती, आरामदायी खुर्च्या, अत्याधुनिक साधन-सामुग्रीचा वापर करून इतरांप्रमाणे ‘हायटेक’ होत आहेत. परंतु, ग्रामीण भागातील कारागिर हा अत्याधुनिक ज्ञानापासून अजूनही कोसोदूर आहे. कार्पोरेट कंपन्यांनी शहरी भागात जसा शिरकाव केला तसाच ग्रामीण भागात शिरकाव केल्यास ग्रामीण भागातील कारागिरांना भविष्यात उपासमारीचाच सामना करावा लागणार आहे. कारण ग्रामीण भागात सुमारे ६० ते ७० टक्के समाज आपल्या पारंपारिक सलून व्यवसायात कार्यरत आहे. आधुनिकतेची कास धरूनच त्यांना भविष्यात पारंपारिक व्यवसाय टिकविणे शक्य होणार आहे. शहरी भागातील तज्ज्ञ बांधवांनी ग्रामीण भागातील कारागिरांना अत्याधुनिकतेचे प्रशिक्षण देऊन ‘तज्ज्ञ’ करणे काळाची गरज बनली आहे. सामुहिक चिंतनाची गरज कोरोना विषाणुने संपूर्ण जगामध्ये अक्षरश: धुमाकुळ घातला. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आपले राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य समजून सलून व्यावसायिकांनी आपला नियमित खर्च, दुकान भाडे, वीजबिल, कर्ज देणी याची पर्वा न करता आपापली दुकाने बंद ठेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. सलून व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असलेल्यांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली. उत्पन्न घटल्याने समाज बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तरीही वैयक्तिक संकटांपेक्षा राष्ट्रीय संकटाशी झुंज देणे समाजबांधवांनी आपले आद्य कर्तव्य मानले. तरीसुध्दा समाज माध्यमावरून टिका आणि टिंगल टवाळकी नाभिकांचीच झाली. कोरोना विषाणूच्या संसर्गाकरिता सलून व्यावसायिक जवाबदार असल्याचा जावईशोध अनेकांनी लावला. असे असले तरीही लॉकडाऊनच्या काळात सलून दुकाने बंद असल्याने केस-दाढी वाढल्यानंतर समाजाची अनेकांना आठवण नक्कीच झाली. डोक्यावरील वाढलेले केस, दाढी या समस्येवर पर्याय शोधत अनेकांनी घरच्या घरी कटींग, दाढी करण्याची मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून ‘टक्कल’ केले. बायका, पोरांची ‘कलाकारी’चर्चेत येण्यासाठी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. टिंगल-टवाळकीच्या भावनेतून तयार झालेल्या अशा पोस्टला समाजबांधवांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण, लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बलुतेदारी पध्दतीत बदल करून उन्नतीसाठी ‘दुकानदारी’ करायला हवी. कोरोनानंतर सलून व्यवसायामध्ये सकारात्मक बदल झाले आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आरोग्याविषयी जागृत होऊन पैशांपेक्षा आपला जीव, आरोग्य महत्वाचे समजू लागला आहे. हीच बाब हेरून ग्राहकांच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनातूनही समाज बांधवाला बदल करणे आवश्यक आहे. हे कार्य कोणा एकाचे नसून याकरीता सामूहिक समन्वय आणि कृतीची गरज आहे. आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या साधनांचा संघटनांमध्ये सुरू असलेले वाद उफाळून काढणे, एकमेकांवर टिका टिपण्णी करण्यापेक्षा व्यावसाय वृध्दीच्या अनुषंगाने एकमेकांशी संवाद स्थापित करून व्यवसायाची दिशा निश्चित करण्याची गरज आहे. समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका बजावून आपल्या भागाची गरज, जीवन शैली आदींचा अभ्यास करून व्यावसायिक पध्दती, प्रक्रियेचा आराखडा तयार करायला हवा. श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सकारात्मकतेची कास धरण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केल्यास नक्कीच वैक्तिगत अन् समाजाची प्रगती साधली जाऊ शकते. तुषार विष्णू वखरे (औरंगाबाद) मो-९८८११७७९३३

Friday, March 19, 2021

प्रणाली तू असं करायला नको होतंस....

बहिणीची मैत्रीण प्रणाली हिने आत्महत्या केल्याचे कळताच घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला. प्रणालीचे लग्न बँकेतील अधिकाऱ्यांसोबत ठरले हे सांगताना काही वर्षांपूर्वी ती स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेली होती. वराकडील मंडळींनी हुंडा मागितला हे सांगताना मात्र तिचा चेहरा पडलेला होता. मुलीचे कल्याण होईल, ती सुखी राहील या आशेने तिच्या आई- वडिलांनी वराकडील मंडळींच्या प्रत्येक मागणी, गोष्टींची पूर्तता करून थाटात लग्न लावले. लग्नात अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही सासरच्या मंडळींची 'डिमांड' काही कमी झाली नाही. संसाराचा गाडा थोडा पुढे पुढे सरकायला लागला की सासरची मंडळी माहेरहून हे आण, ते आण म्हणून तिच्याकडे 'डिमांड' करायचे. आई-वडिलांनी ह्यांना कितीही दिले तरी कमीच असतं हे प्रणालीला कळून चुकलं होत. अनेकदा 'ती' गप्प बसुन सासरच्या मंडळींचा छळ सहन करत गेली. यातच 'गोड' बातमी कळल्यानंतर ती होणाऱ्या छळाकडे दुर्लक्ष करत गेली. काही महिन्यांपूर्वी तिने एक गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्याच्या आनंदात ती न्हाहून निघाली. पण तो क्षणही तिच्यासाठी क्षणिकच होता. मुलगी झाली म्हणून सासरची मंडळी नाराज होती. तिला बघायलाही कोणी आले नाही. आनंदाच्या क्षणी सासरच्या मंडळींचे असे वर्तन बघून तिला मानसिक धक्काच बसला. महिना, दोन महिने, तीन महिने उलटूनही सासरच्या मंडळींच्या अशा वर्तनामुळे ती मानसिक तणावात होती. माहेरी असताना नवरा-बायको यांच्यात फोनवर वाद झाला अन प्रणालीने मागचा-पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलून गळफास घेतला. तिच्या या निर्णयामुळे जसा आम्हाला धक्का बसला त्याही पेक्षा जास्तच तिच्या आई- वडिलांना बसलेला असेल. कोणाचं मन न दुखवणारी, हसऱ्या स्वभावाची मुलगी तिच्या एका निर्णयामुळे सर्वांना रडवत आहे. नराधम पती, हावरट स्वभावाची सासरची मंडळी यांना तू धडा शिकवायला हवा होता. परंतु, प्रणाली तुझी काहीही चूक नसताना तू स्वतःला शिक्षा करून घेतलीय. असं तू खरंच करायला नको होतंस. तुझा छळ करणाऱ्या प्रत्येकाला न्याय व्यवस्था शिक्षा देईल, पण तुझ्या त्या गोंडस मुलीच्या भविष्याचा तू विचार करायला हवा होतास. असतात गं सासरच्याकडील मंडळी हावरट. त्यांना कितीही केलं आणि कितीही दिलं तरी कमीच असते. मुलीसाठी आई-वडील काय काय सहन करतात हे कदाचित अनेकांना कळत नाही, कारण त्यांना मुलगी नसते ना. मुलगा म्हणजेच त्यांच्यासाठी सर्वकाही असतो. 'पती' म्हणजे हक्क गाजवणारा असतो. तो म्हणेल, सासरची मंडळी म्हणेल तीच दिशा त्यांच्यासाठी योग्य असते. हे तुला कळून चुकलं असेलच म्हणूनच रोजच्या छळाला कंटाळून तू मुक्ती मिळवून घेतलीय गं. पण या जगात असा त्रास सहन करणारी तू एकटी नव्हतीस हे कदाचित तू विसरली असावी. तुझ्यासारखे दुःख सहन करणाऱ्या अनेक 'प्रणाली' आजच्या घडीला सासरची मंडळी, पतींचा त्रास सहन करताय. त्यांच्याप्रमाणे तुही मनाने सक्षम राहून त्यांना धडा शिकविण्यासाठी दोन हात करायला हवे होतेस. होऊन होऊन काय झालं असत, तुला लोकांनी नाव ठेवलं असत. लोकांचे कामच असतं गं नाव ठेवणं. त्याकडे दुर्लक्ष करून तू त्या नराधमांना न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून धडा शिकवायचा होतास. प्रणाली, तू संयम बाळगायला हवा होतास. पण असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतंस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवा, भावपूर्ण श्रद्धांजली.

Wednesday, June 10, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ७

कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून रूग्णालयातील प्रवास आतापर्यंतच्या भागामध्ये नमुद केलाय. खरी परीक्षा तर घरी गेल्यानंतर होणार होती. डिस्चार्ज झाला तरी मी पॉझिटिव्ह होतो. पुढील सात दिवस इतरांपासून विभक्त राहून स्वताची काळजी घेण्याचे डॉक्टरांनी सांगितले. सात ऐवजी १४ दिवसांपर्यंत एका खोलीमध्ये मी एकप्रकारे कैद होतो.


जिल्हा रूग्णालयातील डिस्चार्ज सोहळ्यानंतर घरी जाण्यासाठी बसची वाट पहावी लागली. पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर सिटी बस आली. अन्य रूग्णांचाही यात समावेश असल्याने खचाखच भरलेल्या बसमध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडालेला होता. पुंंडलिकनगर गल्ली नंबर एकसमोर दोघांना सोडण्यात आले. गल्लीमध्ये जाण्यासाठीचा रस्ता पत्र्यांनी पूर्णपणे बंद केलेला होता. आम्ही जाताच बाजूला बसलेले पोलिस कर्मचारी आले. तुम्ही डिस्चार्ज झालेले रूग्ण आहेत का? अशी विचारणा केल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आमचे फोटो काढले. आम्ही बाजूला असलेल्या जागेतून गल्लीमध्ये प्रवेश केला. मित्रांसह गल्लीतील रहिवासी स्वागतासाठी उभेच होते. घराजवळ जाताच गाणे वाजवून, फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. त्यांच्याशी बोलण्याचा मोह टाळून मी सरळ घरामध्ये गेलो.
----
गल्लीमध्ये एकप्रकारे कर्फ्यूच
गल्लीमध्ये आमच्या दोघांसह अन्य दोन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. अन्य दोघे आमच्या अगोदरच उपचार घेऊन ठणठणीत घरी परतलेले होते. डिस्चार्ज नंतरही मी पॉझिटिव्ह असल्याने गल्लीतील सर्वजण घाबरलेले होते. इतरांना त्रास नको म्हणून घराबाहेर न निघण्याचे ठरवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लॉकडाऊन शिथिल झाल्याने वडील भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले. १७ दिवसांपासून घरात जे होते तेच बनवून वडील खात होते. आम्ही आल्याने त्यांना बाहेर पडायला मिळाले. भाजीपाला घेऊन ते गल्लीत येताना त्यांना पोलिसांनी अडविले. त्यांच्या जवळील दुचाकी पोलीस सोडत नव्हते. त्यांनी घरी येऊन हा प्रकार सांगितला. मी स्वतः बाहेर जावून गाडी घेऊन आलो. यासाठी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांशी चर्चाही करावी लागली. बस्स हा प्रसंग वगळता पुढील १४ दिवस घराबाहेर पडलेलो नव्हतो. नेहमी किलबिलाट असणाऱ्या गल्लीमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण निघाल्यानंतर एकप्रकारे कर्फ्यूसारखे वातावरण तयार झालेले होते. (अनेकांची मने दुखावेल या हेतूने खऱ्या परिस्थितीचे वर्णन करणे टाळत आहे.) 
----
वडील बनले होते ‘आत्मनिर्भर’

आमच्या रूग्णालयातील पहिल्या दिवसांपासून डिस्चार्ज होईपर्यंत वडीलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. स्वताच्या हाताने जेवण बनवून खाणे, बाहेर न निघणे, कोणाशी संवाद न साधणे इतकेच काय बहिष्कार टाकलेल्या व्यक्तींप्रमाणेच त्यांना रहावे लागले. कधी स्वताच्या हाताने पाणी न घेणाऱ्या वडीलांवर स्वता जेवण बनविण्याची वेळ आली होती. स्वयंपाक कसे बनवायचे याचे धडे ‘व्हिडीयो कॉलींग’द्वारे आईकडून त्यांना मिळत होते. १७ दिवसांमध्ये आत्मनिर्भरतेने ते पूर्णपणे ‘स्वयंपाकी’ बनले होते. २० मे २०२० आम्ही डिस्चार्जनंतर घरी येण्यापासून हे लिहिपर्यंत अर्थात १० जूनपर्यंत त्यांनी स्वता आमच्यासाठी स्वयंपाक बनविला आहे. अजूनही त्यांची ही मोहिम सुरूच आहे. याकाळात त्यांनी दररोज आमच्या प्रकृतीबद्दल माहिती जाणून घेत होणारा त्रास-सुधारणा हे डायरीमध्ये लिहून ठेवलय. दररोज येणाऱ्या फोनची नोंदसुध्दा त्यांनी डायरीमध्ये करून ठेवली आहे. ते दररोज नोंद करत असलेली डायरी माझ्या हाती लागल्याने डायरीचे गुपीत मला कळले. आम्ही केवळ कोरोनाग्रस्त होतो. परंतु, ते आमच्यापेक्षाही जास्त दुखाने ग्रस्त होते. त्यांना होणारे दुख ते कोणाला सांगू शकत नसले तरी माझ्या निदर्शनास येत होते.
--------
पुन्हा मला अ‍ॅडमिट होण्यासाठी फोन

घरी येऊन एक दिवस उलटत नाही तोच तुमचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने अ‍ॅडमिट व्हावे लागेल, असा फोन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. मग डिस्चार्ज का दिला? असा प्रश्न मी उपस्थित केला. आम्हाला काही माहित नाही, अ‍ॅम्बुलन्स येईपर्यंत तुम्ही तयारी करा असे समोरील व्यक्तीने सांगितले.  पत्रकार मित्र आणि कार्यालयातील वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. काही मिनिटांमध्येच मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला. नेमकी कोणाचा फोन आलता?, तुम्हाला काही त्रास आहे का?, अशी विचारणा करत आता अ‍ॅडमीट होण्याची गरज नाही. तुमच्यापासून कोणाला धोका नाही अन् कोणापासून तुम्हालाही धोका नाही असे म्हणत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत काही औषध पाठवत असल्याचे सांगून काही त्रास असेल तर सायंकाळी पुन्हा कळवा असे त्या म्हणाल्या. त्यावेळी माझी प्रकृती चांगली होती. फक्त खोकला अन घस्यात थोडा त्रास होता. याची कल्पना मी त्यांना दिली. ( सायंकाळी मात्र त्यांना फोन करून प्रकृती बद्दल माहिती देण्यास मी विसरलो) आरोग्य अधिकाऱ्यांच्या फोननंतर पंधरा मिनिटानंतर लगेचच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी औषधी आणून दिल्या. घडलेला प्रकाराचे वृत्त दैनिकांमध्ये प्रकाशित झाले. नागरीकांनी हे वृत्त छापण्यामागील हेतू लक्षात न घेता वेगळीच चर्चा सुरू केली. पॉझिटिव्ह रूग्णावर घरात उपचार सुरू आहे, अशी चर्चा, अफवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आली. या प्रकारानंतर अधिकच मनस्ताप झाला.
----------
मनाला कोरोना होऊ देऊ नका

ताप, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्याचा त्रास, पोट खराब होणे, डोकेदुखी आदी सर्वसाधारण लक्षणे कोरोनाची आहे. लक्षणे जाणवू लागले की डॉक्टरांचा सल्ला, तपासणी करून घेणे हाच कोरोनाला वेळीच रोखण्याचा उपाय आहे. नेमकी काय त्रास होतोय, हे डॉक्टरांना न घाबरता मनमोकळ्यापणाने सांगायला हवे. अनावधानाने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे दडपण घ्यायला नको. मधुमेह, श्वसन, किडणी, ह्दयरोग आदी समस्या तसेच वय जास्त असेल तर जास्तीची काळजी घ्यायला पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार गोळ्या घ्यायला पाहिजे. चांगल्या गोष्टींमध्ये मन रमवायला पाहिजे. कोरोना व्हायरसची लक्षणे ही केवळ शरीरापर्यंत मर्यादीत असते. कोरोना मनापर्यंत पोहचला तर सर्वकाही संपल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे मनाला कधी कोरोना होऊ देऊ नका, असे आतापर्यंतच्या व्यक्तिगत अनुभवावरून वाटते.
--------
नकळतपणे पसरतो आजार

कोरोना कसा होतो, यासंदर्भात कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. मी पत्रकारितेच्या निमित्ताने बाहेर वावरताना सर्व प्रकारची काळजी घेत होतो. सॅनिटायझर, मास्क यासह वेळोवेळी हात धुणे हा प्रकार करतच होतो. सर्व नियमांचे पालन करूनही कळत न कळतपणे कोरोना घरापर्यंत येऊन पोहचला. कोरोना संसर्गजन्य असल्याने तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचतो. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार त्याची लक्षणे इतर पॉझिटिव्ह रुग्णांमार्फत इतरांपर्यंत पोहचू शकतात. याशिवाय खोकला, शिंकणे तसेच थुंकल्याने या आजाराच्या विषाणूंचा प्रसार होतो. त्या विषाणूच्या संपर्कात असलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थांवर ते विषाणू जावून बसतात. हवेद्वारे कोरोना विषाणू पसरत असल्याने परिसरातील व्यक्तींना नाक, तोंडावाटे कोरोणाचा बाधा होऊ शकतो.
आगामी काळामध्ये कोरोनासोबतच सर्वांना जगायचं आहे ही मानसिकता आतापासूनच बनवून घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यानंतर आता पावसाळा आणि नंतर हिवाळा या ऋतूत साथीचे आजार होणारच आहे. यातच कोरोनाचा फैलाव होऊन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांमध्येही प्रचंड वाढ होणार आहे. इतर सर्वांनाच कोरोना पसरवणारे संभाव्य शरीर म्हणून सर्वांना बघावे लागणार आहे. हा विचार करूनच सर्वांनी सावधानता बाळगुनच कामकाज करणे गरजेचे आहे. हे करताना माणसात अंतर असावे माणुसकीत नव्हे.
कोरोना भितीचा विस्तार वाढवण्यापासून रोखण्यासाठी आपल्या मनातली संवेदना जिवंत ठेवणे गरजेचे आहे. हीच संवेदना आपल्या भीतीला आपलाच शत्रू होण्यापासून रोखू शकणार आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये इतका स्वार्थ आणि जगण्याचा मोह निर्माण झाला की जगण्यासाठी इतरांशी अमानुषपणे वागायलाही माणूस मागे-पुढे बघत नाहीये. समाज आणि परंपरेतील मूल्य या कोरोनाने नष्ट केलीय. या मूल्यांबरोबरच संवेदना, संवाद, आपुलकी, सहकार्य यासारख्या भावना कोमजल्या आहेत. आज असलेला कोरोना भविष्यामध्ये नष्ट होणारच आहे. यास विलंब लागेल मात्र कोरोनासोबत जगण्याची सर्वांनी दर्शविली पाहिजे. संवेदना, संवाद, आपुलकी या कोमेजलेल्या भावनांना नवचेतना प्रदान करणे गरजेचे आहे. भीतीने भयभीत न होता या आजाराला सामोरे गेलेल्यांना धीर देण्याचे काम आगामी काळात झाल्यास नक्कीच कोरोनाशी दोन हात करण्यास सर्वजण यशस्वी होतील. माझा उपचारानंतरचा कॉरन्टाईन पिरियड संपलेला असला तरीही अजून घरामध्येच आहे. लवकरच फिल्डवर येणार असल्याने आपल्याशी नक्कीच संवाद, भेट होईल. (आतापर्यंतचे सर्व अनुभव लिहिताना कोणाचे मन दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. किंवा जाणूनबुजून कोणाला टार्गेटही करण्यात आलेले नाही. जे घडलय तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाने इतरांना स्वार्थी बनविलेले असले तरीही मी जसा होतो तसाच आगामी काळात राहणार आहे. इतकेच नव्हे तर त्यापेक्षा अधिक इतरांच्या मदतीसाठी कसा येईल यासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी आपल्या सर्वांची मदत, सहकार्य नक्कीच लागणार आहे.) {समाप्त}

नाभिक समाजावर टिका करणाऱ्यांनी थोडा विचार करा....

नाभिक समाजावर टिका करणाऱ्यांनी थोडा विचार करा....

डोक्यावरचे केस वाढले की पुरूष मंडळी सलूनमध्ये जातात आणि केस कापूण घेतात. कारण प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले केस त्रासदायक ठरतात. थोडक्यात ‘केस कापणे’ ही एक गरजेची बाब आहे. केस कापण्याचे काम साधेसुधे नाही. हे काम अतिशय कौशल्याने करावे लागते. प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करण्याचे काम हा समाज पिढ्यानपिढ्या करीत आहे. जसजशा ग्राहकांच्या गरजा वाढत गेल्या तशाच पध्दतीने या समाज बांधवाने आपल्या व्यवसायात बदल केले. हा बदल करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना आला असेल किंवा अद्यापही येत असेल. हा व्यवसाय थाटण्यासाठी दुकानाची गरज असते. दुकान मालकांकडे ठराविक रक्कम जमा करून सुमारे पाच हजारांपासून २५ हजारांपर्यंत साधा दुकानचालक दरमहा भाडे देत आहे. ज्यांनी सलून व्यवयासाला अत्याधुनिकतेचे रूप दिले त्यांच्या दुकानांचे भाडे लाखांच्या घरापर्यंत आहे. याशिवाय दुकानामध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, कॉस्मेटिक तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार अन्य बाबींचा समावेश दुकान चालक, मालकाला करावा लागतो. स्पर्धेच्या काळामध्ये असे न केल्यास ग्राहक दुरावण्याची शक्यताही असते. हाच विचार करून कर्जांचा डोंगर डोक्यावर घेऊन अनेकांनी ग्राहक हित जोपासण्यासाठी यात उडीही घेतली आहे. याच दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची समस्याही अशीच काहीसी आहे.
या समाजातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे शेती नाही. दुकाने, राहती घरे भाडेपट्याने घेतली आहे. भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च प्रत्येकावर आहे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी यासाठी हा समाज आंदोलनाचे हत्यार उपसत आहे. राज्य शासनाच्या विरोधात पुकारलेल्या या आंदोलनानंतर अनेकांनी समाजाला टीका करण्यास सुरूवात केली. आंदोलन करण्यासंदर्भात कोणीतरी उचकवलं असेल, याच समाजाला आता अडचणी निर्माण होत आहेत का?, दर वाढविल्याचे फळ भोगा आता, दुकाने बंद करून घरीच बसा अशा प्रकारच्या टिका टिपणीही समाजावर होत आहे. या टिका-टिपणी करणाऱ्यांची खऱ्या अर्थाने किव येते. स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणाऱ्या या समाजाची कला आता तुम्हाला सोपी वाटतेय म्हणूनच तर हे सुरू नाहिये ना..? लॉकडाऊनच्या काळात सलून दुकाने बंद असल्याने केस-दाढी वाढल्यानंतर समाजाची अनेकांना आठवण नक्कीच आली. डोक्यावरील वाढलेले केस, दाढी या समस्येवर पर्याय शोधत अनेकांनी घरच्या घरी कटिंग, दाढी करण्याची मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून ‘टक्कल’ही केले. बायका, पोरांची ‘कलाकारी’ चर्चेत येण्यासाठी अनेकांनी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. ऐरवी दाढी करताना एखादा केस राहिल्यावर चुका दाखवून देणारा ग्राहक लॉकडाऊनच्या काळात बायकोच्या चित्रविचित्र ‘कलेला’ दाद दाखविताना दिसला. आपल्याच घरातील सदस्यांकडून केसकर्तन करणाऱ्या त्या चित्रविचित्र प्राण्यांबद्दल आदरभाव आहेच. कारण लॉकडाऊनने त्यांच्यातील, घरातील सदस्यांच्या कलेला सर्वांसमोर आणून जिवंतपणा दिला.
आता कोरोनाच्या पाश्वभूमीवर नाभिक समाजातील चालक-मालकांनी दुकानांमध्ये बदल करण्यास सुरूवात केले आहे. ग्राहकांना धोका नको, म्हणून खबरदारी बाळगण्यासाठी दुकानांमध्ये सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली. दुसऱ्यांचेच आरोग्य जपण्यासाठी हा खटाटोप समाजबांधवाने सुरू केला. हे करताना त्यांना आर्थिक झळही सोसावी लागत आहे. याचा ताळमेळ घालण्यासाठी समाज बांधवांनी आपल्या सेवेच्या दरांमध्ये थोड्या-फार प्रमाणामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सर्व बाबींचा विचार केल्यास दरवाढीचा निर्णय योग्यच आहे. असे असतानाही आपली तलब पूर्ण करण्यासाठी दररोज १० रूपयांपासून हजारो रूपये खर्च करणाऱ्यांनी दरवाढीवर तोफ डागण्यास सुरूवात केली आहे. इतके कुठे दर असतात का?, जास्तच माजलेत हे असे म्हणत सोशल मिडियावर पोस्टही व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे. याचा खेद नव्हे अशा लोकांच्या मानसिकतेची कीव येते. या लोकांनी मोबाईलमध्ये बोटं हलवून एखादी पोस्ट व्हायरल करताना विचार करावा. टिका-टिपणीला उत्तर देण्यास या समाजातील प्रत्येकजण तयारच आहे. सहनशिलतेचा अंत कोणीही पाहू नये. जर दरवाढ पटत नसेल तर लॉकडाऊनच्या काळात वापरलेला फंडा या सर्वांसाठी खुला आहे. अशा प्रकारे कोणाच्या कलेचा अनादर, समाजाच्या भावना दुखविण्याचा अधिकार कोणत्याही मंडळींना नाही.




Tuesday, June 9, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ६

औषधोपाचार सुरू असल्याने होणारा त्रास कमी होत होता. आईच्या प्रकृतीत चार दिवसांमध्येच सुधारणा झाली. मला मात्र खोकला आणि घश्यामध्ये त्रास सुरूच होता. दहा दिवसांच्या उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मला त्रास कायम असल्याने पुन्हा रिक्स नको म्हणून उपचारानंतर पुन्हा लाळेचे नमुने (स्वॅब) घेण्यात यावा, अशी विनंती माझ्यासह मित्रांनी डॉक्टरांकडे केली. त्यानुसार १४ मे २०२० दोघांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. यातच १५ मे २०२० रोजी पुंडलिकनगर भागातील काही रूग्णांना दहा दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज (उपचारानंतर स्वॅब तपासणी न करता) देण्यात आला. आम्हा दोघांना डिस्चार्ज का मिळाला नाही याची चर्चा यानंतर रंगू लागली. अनेकजण डिस्चार्ज बद्दल फोनद्वारे विचारणा करू लागले. स्वॅब नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर डिस्चार्ज मिळेल असे सर्वांना सांगत होतो. दोन दिवस उलटूनही स्वॅबच्या रिपोर्टबद्दल मला समजले नव्हते. सोर्सकडून दररोज मिळणारी माहितीही मिळाली नव्हती. विचारणा केल्यानंतर ते केवळ पेन्डींग असल्याचे सांगत होते. कोणाच्याही रिपोर्टला दोन दिवस लागत नाहीत. नेमकी आमचेच रिपोर्ट पेन्डींग का? असा प्रश्न पडू लागला. प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी एका डॉक्टरांना फोन केला.
-----
नंतर समजले माहिती लपविल्याचे

मुळात दोघांचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशीच आलेले होते. डॉक्टरांनी मला ते कळू दिले नव्हते. डॉक्टरांना फोन केल्यानंतर मला ही बाब समजली. दहा दिवसाच्या उपचारानंतर आमचे घेतलेले स्वॅब रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले होते. त्रास जाणवत असल्याने माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणारच याची मला खात्री होती. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर मला धक्का बसला होता. वडील, बहिण, आजी-आजोबा यांच्यासह अन्य नातेवाईकांना हे सांगितल्यास सर्वच चिंतेत पडतील या हेतुने त्यांच्यापासून ही माहिती मी लपविली. विचारणा केल्यानंतर नव्याने स्वॅब घेण्यात येईल, केव्हा घेतील हे सांगता येत नाही असे उत्तर देत होतो. सर्वांनाच असे लपविणे योग्य न वाटल्याने वडीलांना हे सांगितले. त्यांनी चिंता करू नका, काळजी घ्या असे म्हणत धिर दिला.
----
रिपोर्ट काहीही येवो डिस्चार्ज घ्यावा लागेल

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर होणारा त्रास जाणून घेऊन औषधी देण्यात आल्या. तीन दिवसांच्या उपचारानंतर आईला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नव्हता. १२ दिवस उपचार घेऊनही मला खोकला अन् घश्यात त्रास कायम होता. १८ मे २०२० सकाळी डॉक्टर तपासणीसाठी आले. दुपारी दोघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येईल, असे सांगितले. परंतु, त्या दिवशी आमचे स्वॅब नमुने घेण्यातच आले नाही. १९ मे रोजी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी तुमचा रिपोर्ट आल्यास दुपारी डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगितले. काल स्वॅब नमुने घेतलेच नाही रिपोर्ट कसा येईल? असा प्रश्न मी डॉक्टरांना केला. त्यांनी चौकशी केल्यानंतर स्वॅब घेणारे दोघांचे नमुने घेण्यास विसल्याचे कळले. मग आज नमुने घेऊन उद्या रिपोर्ट आल्यानंतर डिस्चार्ज मिळेल असे सांगून डॉक्टर निघून गेले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यानंतर काही वेळेतच जिल्हा शल्यचिकित्सकांचा फोन आला. रूग्णांवर उपचार करण्याचे गाईडलाईन बदललेले आहेत. दहा दिवसानंतर सर्वांनाच डिस्चार्ज देण्यात येत आहे. नव्याने स्वॅब घेणे नियमबाह्य असून तुमचे मात्र ते घेण्यात आलेले आहे. आता उद्याचे रिपोर्ट काहीही येवोत, तुम्हाला डिस्चार्ज मिळेल असे त्यांनी सांगितले. पॉझिटिव्ह आला तरीही डिस्चार्ज कसा देता येईल असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी काही उदाहरणे मला दिली. हे मात्र मला पटले नाही. याची कल्पना सहकाऱ्यांना दिली. त्याच दिवशी एका वॉर्डामध्ये जमीनीवर रूग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे फोटो रूग्णाने आणून दिले. सत्यता पडताळणीसाठी तेथे जावून पाहणी केली. रूग्णाच्या मदतीने व्हिडीयो काढून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहचविले. वृत्तपत्रे, चॅनल्सच्या मदतीने जिल्हा रूग्णालयामधील खरी परिस्थिती यानंतर सर्वांपर्यंत पोहचली. त्यानंतरच सुधारणा झाली की नाही हे मला डिस्चार्ज मिळाल्याने समजू शकले नाही.
----
आई निगेटिव्ह आणि मी पॉझिटिव्ह

दुसऱ्यांदा घेण्यात आलेला स्वॅब नमुन्यांचा रिपोर्ट आईचा निगेटिव्ह तर माझा पॉझिटिव्ह येईल अशी मला शंका होती. परिचयातील डॉक्टरांशी चर्चा करताना मी हे बोलूनही दाखवले. ‘पॉझिटिव्ह’ विचार करण्याची सवय असल्याने हा रिपोर्टही माझा पॉझिटिव्ह येईल असे ठामपणे त्यांना म्हणालो. काही वेळेस ‘निगेटिव्ह’ विचार महत्वपूर्ण असतात, तुम्ही इतर विचार सोडा अन् आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. २० मे रोजी सकाळीच सूत्रांच्या मदतीने रिपोर्ट मला समजला. यात आई निगेटिव्ह तर मी पॉझिटिव्ह निघालो होतो. आम्हा दोघांना डिस्चार्ज देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. पॉझिटिव्ह असल्याने डिस्चार्ज घेण्याची माझी मनस्थिती नव्हती. हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबरच लोक प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिला. डिस्चार्ज देऊ नये यासंदर्भात अनेकांनी अधिकाऱ्यांना फोन केले. मात्र, नियमांवर बोट ठेवून ‘सुंदर’पध्दतीने हाताळणी केली. मी वाद घालण्याच्या मनस्थितीत होतो. अनेकांनी असं करू नकोस, घरी उपचार सुरू ठेवूयात. पहिले आरोग्याकडे लक्ष दे, असा सल्ला दिल्याने मी माघार घेत डिस्चार्ज करून घेतला. डॉ. अर्चना भोसले, डॉ. महेश लढ्ढा, डॉ. संतोष नाईकवाडे यांनी या प्रकरणात महत्वपूर्ण भुमिका बजावली. आईला धिर देऊन मला काहीही होणार नाही याची खात्री दिली.
--------
अनेकांनी लावले तर्कवितर्क

पॉझिटिव्ह असतानाही मला डिस्चार्ज दिल्याने अनेकांनी नेमकी काय झाले यासंदर्भात तर्कवितर्क लावणे सुरू केले. काहींनी जिल्हा रूग्णालयातील खरी परिस्थिती सर्वांसमोर आणल्यामुळे डिस्चार्ज दिल्याचा तर्क लावला. मुळात, या प्रकारांमुळे अधिकाऱ्यांची माझ्याबद्दल नाराजी होतीच. परंतु, जिल्हा शल्यचिकित्सकांनी माझ्याशी अगोदरच डिस्चार्ज संदर्भात चर्चा केलेली होती. काही हितचिंतकांनी त्यात तर्कवितर्क लावून अफवा पसरविण्याचे काम केले. याने उपचार सुरू असताना समाजकार्य कशाला करायचे, कानाडोळा करायला हवे होते अशी चर्चाही रंगली. परंतु, दररोज घडणाऱ्या घडामोडी ‘एसआरटीवाय’ ग्रुपच्या सदस्यांना माहित होत्या. इतरांनी कितीही तर्कवितर्क लावून केलेली चर्चा माझ्यासाठी करमणूकच होती. (क्रमशः)



Monday, June 8, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ५

तब्बल १७ दिवस रूग्णालयात राहणे आई आणि माझ्यासाठी पहिलीच वेळ होती. इतके दिवस एकट्याने काढणे दोघांनाही अवघड होते. या काळामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून, फोनद्वारे मी सर्वांच्या संपर्कात होतो. येणारा प्रत्येक दिवस कसा जायचा हे मला समजून येत नव्हते. इतके दिवस आमचे कसे गेले याबद्दल... (भाग-५)

पहिल्याच दिवशी नर्सेसने आईच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केलेली चिंता अन् एका रूग्णाचा झालेला मृत्यू हे ऐकून आईच्या मनात भिती निर्माण झालेली होती. त्यानंतरचे दोन दिवस आईची मनस्थिती खराबच होती. अशातच औषधी देण्यासाठी येणाऱ्या नर्सेस सोबत आईचा सलोखा निर्माण झाला. या नर्सेस माझ्या आणि आईमधील संवादाच्या दूत बनल्या. दोघांच्या प्रकृतीबद्दल माहिती जाणून घेऊन त्या आम्हाला सांगत. यातच पाच दिवस मला प्रचंड खोकला आणि घशामध्ये त्रास होता. एक दिवशी रात्री श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टरांनी गोळ्या वेळेवर घ्या, वाफ घ्या असा सल्ला दिला. त्यानुसार मी उपचार घेत होतो.
----
खिडकी अन् नर्सेस 

आम्ही दोघेही वेगवेगळ्या वॉर्डात असलो तरीही एका खिडकीतून एकमेकांना बघता येत होते. आईला माझ्या संपूर्ण हालचाली खिडकीतून स्पष्टपणे दिसत. मला मात्र, बेडवरून उठून आई काय करतेय हे बघावे लागत. खोकला असल्याने अनेकदा मी उठून बसायचो. माझा आवाज आल्यास आईचेही लक्ष माझ्याकडे वेधल्या जायचे. नेमकी काय झाले हे विचारण्यासाठी आई लगेच मला फोनद्वारे संवाद साधायची. एकेदिवशी रात्री दोन वाजेच्या सुमारास मला उलट्यांचा त्रास सुरू झाला. माझ्या आवाजाने आईची सुध्दा झोपमोड झाली. तिने लगेच फोन लावून चौकशी केली. काहीच झालेले नसल्याचे सांगितल्यावर आईला धिर मिळाला. नुसतं, वाफ घ्यायला खाली डोके करून बसलो तरी, काय झाले म्हणून आईचा फोन यायचा. एका खिडकीने आमच्या दोघांमधील प्रेम, जिव्हाळा, ममता, माया, आपुलकी कायम ठेवली होती. फोनवर प्रकृतीबद्दल सांगुनही आई नर्सेसकडे माझ्याबद्दल विचारणा करायची. नर्सेस आल्या की मी आईबद्दल पहिले विचारायचो. एकमेकांबद्दल विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची नर्सेसला सवय झाली होती. रुग्णालयातील प्रवासादरम्यान खिडकी आणि नर्सेस आमच्या दुवा बनल्या होत्या. आजही त्या खिडकीतून आईसोबत होणारा संवाद डोळ्यासमोर येत असतो.
-----
व्हिडीयो कॉलद्वारे सामुहिक चर्चा

घरातील सदस्यांचे असे विभक्त होणे कोणालाही सहन झालेले नव्हते. मला मित्रांचेच जास्त फोन येत असल्याने कुटूंबातील सदस्यांसोबत जास्त संवाद साधता येत नव्हता. आईचे मन रमण्यासाठी व्हॉटस्अप व्हिडीयो कॉलींगचा पर्याय सर्वांसाठी सोईस्कर बनला होता. एकाच वेळी चौघांना सहभागी करून प्रकृतीबद्दल विचारणा केली जायची. आम्हा दोघांबरोबरच वडीलांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत. इतरांना त्यांना मदत करणे शक्य नसल्याने ते स्वता जेवण बनवायचे. व्हिडीयो कॉलींगच्या माध्यमातून ते करत असलेले काम आईसह बहिणींना लाईव्ह बघायला मिळायचे. फोनवर बोलण्यापेक्षा व्हिडीयो कॉल करूनच संवाद साधणे हा पर्याय सर्व नातेवाईकांनी निवडला होता. रेंज प्रॉब्लेममुळे आईचा फोन न लागल्यास नातेवाईक मला फोन करायचे. खिडकीतून आवाज देऊन आईला फोनबद्दल सांगायचो. कॉन्फरन्सवर घेऊन नंतर त्यांचा संवाद सुरू व्हायचा.
------
सफाई कर्मचारी, जेवण पुरविणाऱ्यांची मदत

दररोज रूमध्ये साफ सफाईसाठी कर्मचारी यायचे. प्रकृतीबद्दल ते विचारणा करायचे. अन्य रूग्ण त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागतात ते सांगायचे. १७ दिवसांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत चांगलीच ओळख झाली. जेवण देण्यासाठी येणाऱ्यांसोबतही चांगला सूर जुळला होता. वॉर्डातील रूग्ण नेमकी या दोघांनाच टार्गेट करायचे. रूग्णांचे हे वागणे मला पटत नव्हते. अनेकदा रूग्णांचे सफाई कर्मचारी, जेवण पुरविणाऱ्यासोबत वाद झाल्यास मध्यस्थीची भुमिका निभवायचो. उपचारानंतरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला गरम पाणी पिण्याचे सांगण्यात आले. गरम पाणी कुठे उपलब्ध होईल, याची चर्चा जेवण पुरविणाऱ्यांसोबत केली. माझे काम झाले की मीच आणून देतो असे ते म्हणाले. त्यानंतर सलग ४ दिवस रात्रीच्या वेळी त्यांनी गरम पाणी आणून दिले. माझा अन् कर्मचाऱ्यांचा सलोखा अन्य रूग्णांना मात्र खटकत होता. (मदत करणाऱ्या नर्सेस, सफाई कर्मचाऱ्यांची नावे अर्धवट असल्याने नावाचा उल्लेख टाळण्यात आलाय)... क्रमशः

Sunday, June 7, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ४ ,

भाग एक ते तीनमध्ये घडलेल्या घटना आपण नक्कीच वाचल्याच असतील. यात माझा हॉस्पीटलपर्यंतचा प्रवास, अफवांनंतर घडलेल्या घटना, जिल्हा रूग्णालयातील कारभार, रूग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर अधिकाऱ्यांची ‘सुंदर’पध्दतीने हाताळणी, नर्सेस आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समजूतदारपणा मांडला. तसाच येथे दाखल होणाऱ्या रूग्णांचे कारनामेही समोर यायला हवेत. असेच काही कारनामे, किस्से, धावपळ मी डोळ्यासमक्ष पाहिलेल्या रूग्णांबद्दल. (भाग-४)


दोन दिवसांचा उपचार घेतल्यानंतर वॉर्डामध्ये बाहेर ठेवलेल्या जारमधून पाणी आणण्यासाठी जाताना एक-एक रूग्णांची ओळख होत गेली. नुर कॉलनीत राहणाऱ्या ६७ वर्षीय ‘बाजी’ची सर्वप्रथम ओळख झाली होती. १३ मे २०२० रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यासह वॉर्डातील अन्य तीन रूग्णांनाही सुट्टी मिळाली. ‘बाजी’ जोपर्यंत वार्डामध्ये होत्या, तोपर्यंत मला कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. सकाळी नाश्ता, दुपार अन् रात्रीचे जेवण आल्यानंतर त्याच मला आवाज द्यायच्या. मी झोपलेलो असलो तरी त्या पुन्हा पुन्हा आवाज देऊन उठवायच्या. घरच्या सदस्यांप्रमाणेच त्यांनी काळजी घेतली. त्यांना डिस्चार्ज देताना त्यांचे स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. हा सोहळा संपल्यानंतर अधिकारी कार्यालयात निघून गेले. परंतु, त्या दिवशी ज्यांना ज्यांना डिस्चार्ज मिळाला त्यांना प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल मनस्ताप झाला. त्यांना घरापर्यंत पोहचविण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सची सुविधा विलंबाने करण्यात आली. सुमारे दोन तास डिस्चार्ज झालेले रूग्ण जिल्हा रूग्णालयाच्या पायरीवर बसून अ‍ॅम्बुलन्सच्या प्रतिक्षेत होते. वॉर्डातील अन्य रूग्णांना त्यातील एकाने कल्पना दिली. त्यांनी मला हा प्रकार सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांना यासंदर्भात बोललो. त्यांनी तत्काळ त्या रूग्णांना घरापर्यंत पोहचविण्यासाठी व्यवस्था केली.
----
अन् एक-एक रूग्ण भेटत गेले
वॉर्डातील रूग्णांना एक-एक करून डिस्चार्ज मिळाल्याने अन् रूग्ण उपचारासाठी दाखल होत होते. १५ मे रोजी रात्रीच्या दरम्यान तीन नवीन रूग्ण वॉर्डात दाखल झाले. सेवानिवृत्त अधिकारी त्यांच्या पत्नी आणि मुलासह कोरोनाबाधित झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते एका शासकीय कार्यालयात काम करत असल्याचे त्यांनी ओळखीदरम्यान सांगितले. १६ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास ते नर्सेसशी संवाद साधत होते. त्यांना स्वतंत्र रूम, एसी नसेल तर कुलर, पिण्यासाठी थंड पाणी, सेपरेट टॉयलेट-बाथरूम असावे अशी फरमाईश ते नर्सकडे करत होते. त्यांच्या या मागण्यापाहून नर्सेस बरोबरच मीही अवाक झालो. ११ वाजून गेले तरीही त्यांची 'फर्माईश' पूर्ण होत नसल्याने त्यांनी ‘ओळख’ दाखवायला सुरूवात केली. त्यांनी कुठं-कुठं काम केलंय, त्यांच्या ओळखी कुठपर्यंत आहे याची कथा नर्सेसला सांगू लागले. कोणत्याही मागण्या मान्य होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे नर्सेसने सांगितल्यानंतर त्यांनी ‘ओळखी’चा वापर करण्यास सुरूवात केली. ‘ओळखी’च्या संपर्कानंतर अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या समस्याही पोहचल्या. त्यानंतर माझ्या समोरील, बाजूची अन् तिसरी थोडी लांब याप्रकारे तिघांनाही स्वतंत्र रूम देण्यात आली. इतके करूनही त्यांचे समाधान झालेले नव्हते. दुपारी १ वाजेच्या सुमारास जेवण आल्यानंतर त्यांनी जेवण देणाऱ्यांसोबतच वाद घातला. भात नको, पोळ्या जास्त द्या, थंड पाण्याची व्यवस्था करून द्या अशी मागणी करू लागले. जेवण आणून देणारा त्यांच्याकडे बघतच राहिला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चहा घेताना त्यांना कागदाच्या कपात नव्हे तर ग्लासमध्ये तो हवा होता. त्यांचा स्वभाव जेवण-चहा आणून देणाऱ्याच्या लगेच लक्षात आला. रात्रीचे जेवण देताना या तिघांना पहिले वाटप करण्यात आले. त्यांना भात नको तर पोळ्या असं फर्माइशनुसार देण्यात आले. तरीही या रूग्णाचे मन काही भरले नाही. दुसऱ्या दिवशी जेवणाचा दर्जा खराब असल्याबद्दल त्यांनी वाद घातला. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शेवटी या रूग्णाने घरी उपचार घेतो. मला डिस्चार्ज द्या, असा तगादाच प्रशासनाकडे सुरू केला. त्यांच्या मागण्या वाढतच असल्याने एका महिला डॉक्टरने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर नर्सेस, जेवण देणाऱ्यांच्या तक्रारी करण्यात येईल, अशी धमकी ते देत गेले. रूग्णाच्या अशा वर्तवणुकीला, वारंवार होणाऱ्या मागण्याला कंटाळून पाचच दिवसांमध्ये अर्थात २० मे २०२० रोजी प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज दिला. मुळात रुग्णाला अपूर्ण उपचारविना सोडणे कितपत योग्य होते, हे समजू शकले नाही. दरम्यान, या रूग्णांनंतर मात्र वार्डातील वातावरणही बिघडून गेले. अन्य रूग्णही सोईनुसार उपचार होण्यासाठी त्यांची ‘ओळख’ कुठपर्यंत आहे हे दाखवत होता. एकाने तर आरोग्य मंत्र्यांच्या पी.ए. मार्फत अधिकाऱ्याकडून सोय करून घेतली. २० मे रोजीच मलाही डिस्चार्ज मिळाल्याने पुढे काय झाले हे तेथील कर्मचारीच जाणो.
----------
दोन रूग्ण, नातेवाईकांची दैना बघवेना....

जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रूग्णांची प्रकृती १४ मे रोजी अचानक बिघडली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) हलविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. घाटी प्रशासनाशी जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला. ऐनवेळी घाटी प्रशासनाने नकार दिल्याने या रूग्णावर जिल्हा रूग्णालयातच उपचार करण्याची नामुष्की ओढवली. रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रात्रभर केलेल्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तर १८ मे रोजी एका सिरियस रूग्णांच्या पत्नीची दैना डोळ्यासमक्ष बघितली. माझ्या वॉर्डासमोरील वॉर्डात हिमायत नगर, हिमायत बाग येथील दोघा पती-पत्नीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होता. सायंकाळी सात वाजेनंतर या रूग्णास श्वास घेण्यास त्रास झाला. याची कल्पना डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला दिली होती. शिवाय जवळच्या नातेवाईकास रूग्णालयात येण्यास बोलवा, असेही कळविले होते. उपचार घेणारी त्यांची पत्नीही वृध्द असल्याने काय करावे, कुठे जावे, कोणाला सांगावे अशी स्थिती त्यांच्यासमोर होती. जवळ मोबाईल असताना त्यांना अज्ञानामुळे स्मार्टफोन हाताळता येत नव्हता. डॉक्टरांसह इतर कर्मचारी त्यांच्या पतीच्या उपचारासाठी धावपळ करत होते. आजूबाजूच्या रूग्णांना नंबर लावून द्या अशी विनवणी त्या करत होत्या. मात्र, अन्य रूग्णांनी त्यांना दाद दिली नाही. माझ्या रूमचा दरवाजा त्यांनी वाजवला अन् फोन लावून देण्याची विनंती केली. त्याच दिवशी दुपारच्या वेळेस त्या माझ्याकडे आल्या होत्या. माझ्या पतीला साध्या टॉयलेटमध्ये बसता येत नाही. त्यांना त्रास होतोय ‘कमोट’ टॉयलेट कुठे उपलब्ध होईल हे सांगता येईल का? हे विचारण्यासाठी त्या आल्या होत्या. नर्सेसच्या कॅबीनमध्ये विचारणा केल्यास त्या सांगतील असे सांगून त्यांच्याकडे पाठवुन दिले होते. आता फोन लावून द्या, म्हणत असल्याने मीही गडबडलो होतो. नेमकी काय झाले? हे विचारल्यानंतर त्यांनी प्रकार सांगितला. त्या जे नाव सांगत होत्या, ते मी टाईप करण्याचा प्रयत्न करायचो. परंतु, नाव सेव्ह करताना स्पेलींग मिस्टेकमुळे त्या सांगत असलेले नाव शोधूनही सापडत नव्हते. अखेर फोन लिस्टमधील एक-एक नाव वाचून दाखविल्यानंतर त्यांना हवे असलेल्यांचा नंबर मिळाला. पतीच्या प्रकृतीबद्दल कल्पना देऊन सुमारे दोन तास होऊनही नातेवाईक तिथे आलेले नव्हते. दोन तासानंतर त्या पुन्हा माझ्याकडे नंबर लावून द्या, असे म्हणत आल्या. दुसऱ्यांदा फोन झाल्यानंतर नातेवाईक तासाभरामध्ये रूग्णालयात पोहचले होते. तोपर्यंत या दोघांनाही घाटी रूग्णालयात हलविले होते. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे पॉझिटिव्ह रूग्णांचा वाढलेला आकडा आणि झालेल्या मृत्यूची लिस्ट आली. यात रात्रीच्या रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्या वृध्द पत्नीची दैना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली होती. त्या दिवशी दुपारपर्यंत मला करमले नव्हते. (क्रमशः)