डोक्यावरचे केस वाढले की पुरूष मंडळी सलूनमध्ये जातात आणि केस कापूण घेतात. कारण प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले केस त्रासदायक ठरतात. थोडक्यात ‘केस कापणे’ ही एक गरजेची बाब आहे. केस कापण्याचे काम साधेसुधे नाही. हे काम अतिशय कौशल्याने करावे लागते. प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करण्याचे काम हा समाज पिढ्यानपिढ्या करीत आहे. जसजशा ग्राहकांच्या गरजा वाढत गेल्या तशाच पध्दतीने या समाज बांधवाने आपल्या व्यवसायात बदल केले. हा बदल करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना आला असेल किंवा अद्यापही येत असेल. हा व्यवसाय थाटण्यासाठी दुकानाची गरज असते. दुकान मालकांकडे ठराविक रक्कम जमा करून सुमारे पाच हजारांपासून २५ हजारांपर्यंत साधा दुकानचालक दरमहा भाडे देत आहे. ज्यांनी सलून व्यवयासाला अत्याधुनिकतेचे रूप दिले त्यांच्या दुकानांचे भाडे लाखांच्या घरापर्यंत आहे. याशिवाय दुकानामध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, कॉस्मेटिक तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार अन्य बाबींचा समावेश दुकान चालक, मालकाला करावा लागतो. स्पर्धेच्या काळामध्ये असे न केल्यास ग्राहक दुरावण्याची शक्यताही असते. हाच विचार करून कर्जांचा डोंगर डोक्यावर घेऊन अनेकांनी ग्राहक हित जोपासण्यासाठी यात उडीही घेतली आहे. याच दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची समस्याही अशीच काहीसी आहे.
या समाजातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे शेती नाही. दुकाने, राहती घरे भाडेपट्याने घेतली आहे. भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च प्रत्येकावर आहे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी यासाठी हा समाज आंदोलनाचे हत्यार उपसत आहे. राज्य शासनाच्या विरोधात पुकारलेल्या या आंदोलनानंतर अनेकांनी समाजाला टीका करण्यास सुरूवात केली. आंदोलन करण्यासंदर्भात कोणीतरी उचकवलं असेल, याच समाजाला आता अडचणी निर्माण होत आहेत का?, दर वाढविल्याचे फळ भोगा आता, दुकाने बंद करून घरीच बसा अशा प्रकारच्या टिका टिपणीही समाजावर होत आहे. या टिका-टिपणी करणाऱ्यांची खऱ्या अर्थाने किव येते. स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणाऱ्या या समाजाची कला आता तुम्हाला सोपी वाटतेय म्हणूनच तर हे सुरू नाहिये ना..? लॉकडाऊनच्या काळात सलून दुकाने बंद असल्याने केस-दाढी वाढल्यानंतर समाजाची अनेकांना आठवण नक्कीच आली. डोक्यावरील वाढलेले केस, दाढी या समस्येवर पर्याय शोधत अनेकांनी घरच्या घरी कटिंग, दाढी करण्याची मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून ‘टक्कल’ही केले. बायका, पोरांची ‘कलाकारी’ चर्चेत येण्यासाठी अनेकांनी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. ऐरवी दाढी करताना एखादा केस राहिल्यावर चुका दाखवून देणारा ग्राहक लॉकडाऊनच्या काळात बायकोच्या चित्रविचित्र ‘कलेला’ दाद दाखविताना दिसला. आपल्याच घरातील सदस्यांकडून केसकर्तन करणाऱ्या त्या चित्रविचित्र प्राण्यांबद्दल आदरभाव आहेच. कारण लॉकडाऊनने त्यांच्यातील, घरातील सदस्यांच्या कलेला सर्वांसमोर आणून जिवंतपणा दिला.
आता कोरोनाच्या पाश्वभूमीवर नाभिक समाजातील चालक-मालकांनी दुकानांमध्ये बदल करण्यास सुरूवात केले आहे. ग्राहकांना धोका नको, म्हणून खबरदारी बाळगण्यासाठी दुकानांमध्ये सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली. दुसऱ्यांचेच आरोग्य जपण्यासाठी हा खटाटोप समाजबांधवाने सुरू केला. हे करताना त्यांना आर्थिक झळही सोसावी लागत आहे. याचा ताळमेळ घालण्यासाठी समाज बांधवांनी आपल्या सेवेच्या दरांमध्ये थोड्या-फार प्रमाणामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सर्व बाबींचा विचार केल्यास दरवाढीचा निर्णय योग्यच आहे. असे असतानाही आपली तलब पूर्ण करण्यासाठी दररोज १० रूपयांपासून हजारो रूपये खर्च करणाऱ्यांनी दरवाढीवर तोफ डागण्यास सुरूवात केली आहे. इतके कुठे दर असतात का?, जास्तच माजलेत हे असे म्हणत सोशल मिडियावर पोस्टही व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे. याचा खेद नव्हे अशा लोकांच्या मानसिकतेची कीव येते. या लोकांनी मोबाईलमध्ये बोटं हलवून एखादी पोस्ट व्हायरल करताना विचार करावा. टिका-टिपणीला उत्तर देण्यास या समाजातील प्रत्येकजण तयारच आहे. सहनशिलतेचा अंत कोणीही पाहू नये. जर दरवाढ पटत नसेल तर लॉकडाऊनच्या काळात वापरलेला फंडा या सर्वांसाठी खुला आहे. अशा प्रकारे कोणाच्या कलेचा अनादर, समाजाच्या भावना दुखविण्याचा अधिकार कोणत्याही मंडळींना नाही.

No comments:
Post a Comment