Thursday, June 4, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग २

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यापासून हॉस्पीटलमध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास भाग एकमध्ये नमुद केलेला आहे. तो अनुभव वाचल्यानंतर अनेकांनी मला सोशल मिडिया, फोनद्वारे संपर्क साधून अफवा पसरविणारे, नागरीकांच्या मानसिकतेबद्दल चर्चा केली. आता प्रत्यक्षात जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर कसा गेला पहिला दिवस याबद्दल....(भाग-२)

कोरोना पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांना वार्तांकनाच्या निमित्ताने नेहमी भेटतच होतो. त्यामुळे मला कोरोना झाल्याचे काहीच वाटले नव्हते. फक्त आईला कोरोनाची लागण झाल्याची चिंता होती. कोरोना हा आजार नसून ते एक संकट असल्याने काही दिवसात या संकटावर मात करेलच असा विश्वास मला होता. ४ मे २०२० रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर परिचयातील नर्सने (त्यांना माझ्या हितचिंतकांकडून नंतर त्रास नको म्हणून नाव टाळतोय) उपचारासंदर्भातील संपूर्ण तयारी करून ठेवलेली होती. झोपेतून उठून आम्ही थेट रूग्णालयात आल्याचे आमच्याकडे बघून त्यांना दिसलेच होते. काही वेळानंतर त्यांनी दोघांना साबण, ब्रश, टूथपेस्ट, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल, मास्क आणून दिले. आठ ते दहा दिवसांपासून आईची प्रकृती खराब असल्याने ती ‘सिरीयस’च दिसत होती. एका नर्सने अनावधानाने आईला पाहून ‘सिरीयस’ असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुळात, तो संवाद नर्स-नर्समधील होता. मात्र, आईने तो संवाद ऐकल्याने ती आणखीनच खाबरली होती. सतत सुरू असणारे फोन अन् मिळालेल्या वेळेत आईशी संवाद असाच खेळ सुरू होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास नास्ता आला. यात उकडलेली अंडी आणि पोह्याचे पाकिट होते. काहीच खायची इच्छा होत नसल्याने माझ्याकडील नाश्त्याचे पाकिट तसेच ठेवून दिले. परिचयातील नर्सच्या ड्यूटीचा वेळ संपूनही त्या संपूर्ण व्यवस्था होईपर्यंत थांबलेल्या होत्या. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एका वॉर्डामध्ये मला रूम देण्यात आली. रूममधून बाहेर निघू नका, अन्य रूग्ण हे तुमच्यापेक्षा जास्त सिरीयस आहेत, असे नर्सने दोघांनाही समजावून सांगितले होते. नंतर ड्यूटीवर आलेल्या नर्सला दोघांकडे लक्ष द्यायला सांगून त्या निघून गेल्या. त्यानंतर आईला धिर देत मी माझ्या वॉर्डामध्ये गेलो. वॉर्ड वेगवेगळे असले तरी दोघांच्या रूमच्या एका खिडकीतून आम्हाला एकमेकांना बघता येत होते. हिच खिडकी पुढील काळामध्ये दोघांना सहारा बनली होती.
----------
अन् असे सुरू झाले उपचार

सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोघांची ईसीजी, ब्लड प्रेशर, रक्ताची चाचणी, छातीचे एक्सरे, आॅक्सीजनचे प्रमाण आदी तपासण्या करण्यात आल्या. एक वाजेच्या सुमारास वरण-भात, पोळी-भाजी असलेले पाकिट देण्यात आले. तत्पूर्वी नर्सने विविध प्रकारचे आठ गोळ्या असलेले पाकिट आणून दिले. गोळ्या खाण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या. या दिवसभरातील गोळ्या आहेत का? असे कुतूहलाने नर्सला विचारले. दिवसभराचे नव्हे हा दुपारचा डोस असून रात्री नव्याने देण्यात येईल असे नर्सने सांगितले. जेवण भरपूर करा नंतरच गोळ्या घ्या, असा सल्लाही त्या द्यायला विसरल्या नाही. जेवणाची इच्छाच होत नव्हती. परंतु, गोळ्या घ्यायच्या असल्याने कशीतरी एक पोळी खाल्ली. सतत फोन सुरू असल्याने सायंकाळचे साडे चार कधी वाजले हे कळलेच नाही. गोळ्यांचा डोस घेतल्याने सुस्ती येत होती. मोबाईल सायलेंट मोडवर टाकून बोलता बोलता कधी झोप लागली हे कळलंच नाही. रात्री आठच्या सुमारास झोपेतून उठलो. मोबाईल हातात घेतल्यानंतर अनेकांचे मिस कॉल पाहिले. त्यात आईचा फोन आलेला दिसल्याने तिच्याशी संवाद साधला. जेवण केलं का? अशी विचारणा तिने केली. दुपारचे जेवण झाले. आता रात्री आल्यानंतर करतो असे म्हणालो. अरे, जेवण तर सात वाजताच आले होते. तु घेतले नाहीस का? असा प्रश्न तिने केला. झोपलेलो होतो, त्यामुळे लक्ष नव्हते. कोणाला तरी सांगतो, तु काळजी करू नको असे म्हणत आईला आराम करण्यास सांगितले. तितक्यात सचिन अंभोरे या पत्रकार मित्राचा फोन आला. अडचणीसंदर्भात त्याने विचारणा केली. घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्याने लगेच डब्बा आणून देण्याची तयारी दर्शविली. रूग्णांना नातेवाईकांना भेटता येत नसल्याने त्याला डब्बा आणू नको, दुपारचे जेवण उरलेलं आहे तेच खावून घेतो, तु निवांत रहा, असे म्हणत संवाद थांबविला. माझ्या नकारानंतर त्याने रूग्णालयातील डॉक्टरांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. लगेच डॉक्टरांचा मला फोन आला. जेवण आणून देणारा निघून गेल्याने सोय करता येणार नसल्याची कल्पना त्यांनी दिली. काहीच हरकत नाही, असे म्हणत नंतर दुपारी आलेले जेवनाचे पाकिट उघडले अन् त्यावर ताव मारून गोळ्या घेतल्या. गोळ्यांच्या सेवनानंतर गाढ झोप लागली.
------
‘ते’ विचारल्यावर चिड यायची
अनेकजण कोरोना नेमकी कशामुळे झाला यासंदर्भात फोनद्वारे चर्चा करायचे. यातील अनेकजण तुझ्यामुळेच आईला कोरोना झाला का? असा प्रश्न करायचे. माझ्यामुळेच आईला कोरोना झालाय हा ठपका सर्वांनी माझ्यावर मारलाय हे मला कळून चुकलेल होते. तरीही, हा प्रश्न ऐकुन प्रश्न विचारणाऱ्यांची चिड यायची. मी स्वताहून आईचा जिव धोक्यात कशाला टाकेल, हे लोकांना कसं समजत नाही यावर नेहमीच विचार करत बसायचो. नेहमीच विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची नंतर सवयच करून घेतली. तर दुसरीकडे माझ्या संपर्कातील खास करून ‘एसआरटीवाय’ व्हाट्सअप ग्रुपमधील सदस्य संतोष हिरेमठ, रोशनी शिंपी, अर्पिता शरद, योगेश पायघन, प्रताप अवचार हे कोणी पॉझिटिव्ह निघाले नाही याचा आनंदही वाटायचा. मी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर ‘एसआरटीवाय’मधील सदस्यांनी दाखविलेली समयसुचकता, माणुसकी, सहकार्य हे प्रोत्साहन देणारेच ठरले.
------
वडीलांच्या जेवनाची चिंता
उपचारासाठी सकाळीच रूग्णालय गाठल्याने वडीलांच्या जेवनाची चिंता सतावत होती. मित्रांना यासंदर्भात कल्पना दिली. मित्रांनी डब्बा पोहचवितो, चिंता करू नको असे सांगितले. याची कल्पना वडीलांना दिली. श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. शेखर क्षिरसागर यांनी वडीलांना डब्बे पोहचविले. श्री. प्रशांत नाईक, श्री. शिवाजी गाडेकर, श्री. विष्णू जाधव यांनी वेळोवेळी आमच्या बरोबरच वडिलांच्या जेवणाच्या डब्ब्यासंदर्भात चर्चा करून पोहच करण्याबाबत स्कारात्मकता दर्शवली. परंतु, आम्ही पॉझिटिव्ह निघाल्यानंतर गल्लीतील वातावरणच (लोकांच्या मानसिकतेबद्दल भाष्य टाळतोय) बदलले होते. घरी येणाऱ्या व्यक्तीकडे, मदत करणाऱ्यांकडे वेगळ्याच नजरेने बघितल्या जात होते. हा प्रकार वडीलांनी आईला फोनद्वारे बोलून दाखविला. दोन दिवस या प्रकारापासून मी अनभिज्ञ होतो. डब्बे मिळताय का? अशी विचारणा वडीलांना केल्यानंतर हा प्रकार मला कळला. निशब्द होऊन वडीलांशी संवाद बंद केला अन् मुंबईत राहणाऱ्या बहिणीला फोन लावला. अशाच गप्पा मारताना तिने घरातील पीठ संपल्याने वडिलांना नंतर जेवणाचे वांदे होतील, असे सांगितले. दोन दिवसांपूर्वीच दळून आणलंय, असे ठामपणे मी बहिणीला म्हणालो. दळण अजून आणलेलं नाही. तू पॉझिटिव्ह निघण्याच्या एक दिवस अगोदर रात्री गहू गिरणीमध्ये नेले होते. रात्र झाल्याने गिरणी चालकांने सकाळी दळून देण्याचे सांगितल्याने दळण तिथेच ठेवलं होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह निघाल्यानंतर संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आल्याने गिरणीत टाकलेलं दळण घरी आणताच आले नाही, असे बहिणीने सविस्तरपणे सांगितले. आता काय करावे अन् कोणाला सांगावे हे सुचत नव्हते. श्री. सागर मगरे यांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच गव्हाच्या पिठाचे पाकिट वडीलांपर्यंत पोहचविले. त्यानंतर ‘आत्मनिर्भर’ होऊन वडीलांनी दिवस काढले. (त्यांच्या ‘आत्मनिर्भर’तेचा फायदा आम्हाला कसा झाला हे पुढील भागात नक्कीच सांगतो)
--------
अन् ‘त्यांचा’ सांभाळ कोण करणार

दोघेही पॉझिटिव्ह निघाल्यानंतर वडीलांची तपासणी होणार हे माहितच होते. घरामध्ये तिघांव्यतिरिक्त अन्य दोन सदस्य होते. त्यांचा सांभाळ कोण करणार? ही चिंता सतावत होती. श्री. रमेश राऊत यांना फोन करून ‘त्यांना’ घेऊन जा, असे कळविल्याचे वडीलांनी सांगितले. हे न पटल्याने मी लगेच नकार देत श्री. रमेश राऊत यांनाही ' त्यांना' घेऊन जावू नका अशी विनंती केली. पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनीही होकार दिला. सुदैवाने वडीलांचा अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह निघाला अन् ते ‘दोन्ही’ सदस्य घरातच राहिले.
-------
दिलेली माहितीच झाली व्हायरल

माझ्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य, पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी माझ्याकडून घेतली होती. मागील आठ दिवसांमध्ये मी कोणाच्या संपर्कात आलो, याची लिस्ट मित्राच्या मदतीने त्यांनी तयार केली. आणखी कोणाचे नाव राहिले का? किंवा कोणाला तपासणी करायची का? या हेतूने फायनल करण्यापूर्वी मित्राने ती यादी ग्रुपवर (पुंडलिकनगर गल्ली नंबर एक आणि दोनमधील युवकांचा ग्रुप) शेअर केली. ग्रुपवर यादी शेअर करणाच्या मित्राचा हेतू चांगला होता. परंतु, एका कॉपी पेस्टरने ती यादी अनेक ग्रुपवर शेअर केली. कॉपी-पेस्टरच्या व्हायरल पोस्टनंतर परिसरातील काहींनी ही यादी व्हॉटस्अप स्टेटसवर ठेवून अकलेचे तारे तोडले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर असे करणाऱ्याची चांगलीच खरडपट्टी झाली.
(तुर्तास भाग दोन इथे थांबवितो. )

No comments:

Post a Comment