Wednesday, May 21, 2025

शिवाजीनगर रेल्वे ब्रिज प्रकरण: ‘निकृष्ट नियोजनाची चिठ्ठी’ – जबाबदाऱ्यांच्या खापरफोडीचा खेळ!

माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -३} दिनांक १९ मे २०२५

छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर येथील रेल्वे फाटक क्र. ५५ जवळील रोड अंडर ब्रिज (सब-वे) मध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्याने स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. पावसाच्या काही तासांतच शहराचे नियोजन, प्रशासनाची सजगता, आणि लोकप्रतिनिधींची ‘डोळस’ निरीक्षणे यांची पोलखोल झाली. नागरिक संतप्त आहेत, तर जबाबदार यंत्रणा एकमेकांवर दोष ढकलण्यात मश्गूल आहेत.

रेल्वे विभागाने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी आपले काम 'योग्य पद्धतीने' पूर्ण केले आहे. ड्रेनेज यंत्रणा, रिसीव्हिंग चेंबर, पंपिंग सिस्टम आणि साफसफाईचे मॅनहोल इ. बाबींचा उल्लेख करत रेल्वेने सर्व दोष सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि महानगरपालिकेकडे ढकलला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पीडब्ल्यूडीच्या अपूर्ण स्टॉर्म वॉटर ड्रेनमुळे आणि महानगरपालिकेच्या विलंबामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
रेल्वे विभाग म्हणतो, त्यांनी १.२ मीटरच्या ह्यूम पाईपचा ड्रेन, रिसीव्हिंग चेंबर, आणि साफसफाईची व्यवस्था केली होती. मग प्रश्न असा आहे की, पावसाच्या एका सत्रातच ही व्यवस्था अपयशी का ठरली? जर रिसीव्हिंग चेंबरचे बांधकाम सक्षम असते, तर त्याची भिंत तुटण्याइतका पाण्याचा दाब का झाला? आणि जर ड्रेनेज कार्यरत असते, तर ती कोंडी का झाली?

लोकप्रतिनिधींचा ‘दिखावा’ आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील शंका

घटनेनंतर लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पण नागरिक याला ‘दिखावा’ आणि निवडणूकपूर्व ‘नाटक’ म्हणून पाहत आहेत. 'आता लक्षात येते का? की निवडणुका जवळ आल्यावरच जमिनीवर येण्याची वेळ येते!' असा रोष व्यक्त करत नागरिक म्हणतात की, 'आश्वासनांची खैरात पुरे झाली, आता हिशेब मागण्याची वेळ आली आहे!'

महानगरपालिका व पीडब्ल्यूडीची कुचराई – अर्धवट कामांची कहाणी

पीडब्ल्यूडीने अद्याप पूर्ण न केलेले स्टॉर्म वॉटर ड्रेनचे काम आणि महानगरपालिकेने अद्याप न जोडलेली विद्यमान ड्रेन यामुळे रस्त्यावर पाणी साचले. अशा अर्धवट आणि पळवाट धोरणांमुळे सर्वस्वी नुकसान स्थानिक नागरिकांचे होते. सार्वजनिक निधी खर्च होतो, पण नियोजनाचा अभाव आणि यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव सतत नागरिकांच्या जीवावर बेततो.

या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की, यंत्रणांच्या निष्काळजीपणाने आणि लोकप्रतिनिधींच्या अलिप्ततेने सामान्य माणसाच्या अडचणी वाढत आहेत. पावसाच्या एका दिवशी शहराची व्यवस्थाच ढासळते, हे शहर नियोजनाचे दुर्दैवच आहे. हात झटकणे, दुसऱ्यावर खापर फोडणे, आणि नंतर कामकाजाचे ‘नाट्य’ करणे हीच यंत्रणांची सध्याची कार्यपद्धती आहे. पण यावेळी जनतेचा संताप उफाळलेला आहे, आणि 'धडा शिकवू' हे फक्त शब्द न राहता कृतीत उतरतील, अशीच अपेक्षा आहे.

तुषार विष्णू वखरे
मो-9881177933

#railway #PWD #pwddepartment #bridge #aurangabad #तुषारवखरे #tusharwakhare #NewsUpdate #Sambhajinagar #PWDMinister

No comments:

Post a Comment